पुणे : राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये १९ फेब्रुवारी शिवजंतीपासून राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज बुधवार (१२ फेब्रुवारी) येथे दिली.
सर्व महाविद्यालयांना सूचना…
शाळांप्रमाणेच आता महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्येही राष्ट्रगीत गुंजणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीपासून होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यास सर्वच महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सामंत यांनी पुढे नमूद केले.
महाराष्ट्रात आजघडीला दररोज किमान १५ लाख लोक राष्ट्रगीत म्हणतात. मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येने राष्ट्रगीताचा जागर करणारं देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल, असेही सामंत म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी म्हणून…
उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती करण्याचे संकेत दिले होते. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, असा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, असा आमचा आग्रह असल्याचे सामंत म्हणाले होते.