नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहे. यावरुन भाजपवर जोरदार टीका सुरु आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलिसांत भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
या पुस्तकाच्या लेखक, प्रकाशक तसेच विमोचकावर तातडीने कारवाई करावी. तसेच यावर बंदी घालावी अशी मागणी करत नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. “दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी काल दि. ११ जानेवारी २०२० रोजी दिल्ली भाजप कार्यालयात एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याचे शिर्षक ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ असे आहे. यासंदर्भात स्वतः जयभगवान गोयल यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज हे कोट्यवधी शिवप्रेमींचे आराध्य दैवत असून, त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य कोणाशीही करणे हा आमच्या भावनांचा अवमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती एकत्र करून सर्वसामान्य जनतेवरील अन्याय, दडपशाहीविरोधात संघर्ष पुकारला होता. आज मात्र या देशात सामाजिक विद्वेष निर्माण करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय आणि दडपशाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हा त्यांच्या विचारधारेचा आणि कार्याचा मोठा अवमान आहे.
त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल, प्रकाशक तसेच विमोचक यांच्याविरूद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि या पुस्तकावर बंदी घालण्यासंदर्भात पावले उचलावीत, अशी माझी मागणी आहे,” असे अतुल लोंढे यांनी तक्रार दाखल करताना म्हटलं आहे.
भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (१२ जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.