नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण जाणवत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि बिहार, उत्तर प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये पक्षासमोर असलेल्या अडचणी पाहता, पक्षानं आता कठोरपणे पुनर्रचना करावी किंवा अडगळीत पडण्यास तयार राहावं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
याचबरोबर ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी देखील निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना, पक्षाला पुर्नजीवीत करण्यासाठी ”सर्जिकल” कारवाईची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेत्यांना स्वतःला बदलावं लागेल. आवश्यकता भासल्यास पक्षाने स्वतःला देखील बदलावं लागेल. अन्यथा, आम्ही असंबद्धतेकडे पाहत आहोत. आपला उद्दामपणा जायला हवा, सत्तेतून जाऊन सहा वर्षे झाली असली तरी अनेकजण आजही मंत्री असल्यासारख वागतात. असंही ते म्हणाले.
पक्षातील नेतृत्वाच्या मुद्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश म्हणाले, स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्रोत्साहन देणं व त्यांना वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यांना स्वातंत्र्य आणि स्वायतत्ता द्यावी लागेल.
आपल्या नेतृत्वाची शैली बदलली पाहिजे. आपले बिहारमध्ये अक्षरशा अस्तित्वच नसल्या सारखं आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर आपण जवळपास नामशेषच झालो आहोत. मात्र, आपण राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रबळ आहोत. हरियाणामध्ये देखील आपण परतत आहोत. पक्षानं कठोरपणे पुनर्रचना करण्याची गरज आहे.
यावेळी रमेश यांनी सांगितले की, दिल्ली विधानसभेच्या निकालाने अमित शाहला नाकारल्याचे दाखवून दिलं आहे. जे भाजपाच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा होते. हा एकप्रकारे त्यांना बसलेला तडाखा आहे आणि प्रचार कालवाधीत वापरल्या गेलेली भाषा व विविध डावपेचांना दिलेला नकार आहे.