मुंबई : कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार काँग्रेस नेत्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात केली आहे.
काय आहे प्रकरण…
काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री बनवण्यात आले. मात्र, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारा देशद्रोही मंत्री कसा होऊ शकतो, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत शिवसेनेला धारेवर धरले. २०१५ मधील अधिवेशनात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप, शिवसेना आमदारांनी विरोध करत सहा वेळा अधिवेशनाचं कामकाज स्थगित केलं होतं. अस्लम शेख यांना २०१५ मधे शिवसेनेने ‘देशद्रोही’ म्हटलं होतं, मात्र तेच आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री झाले’ असं सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी ‘ट्विटर’वर व्हिडीओ शेअर करुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!!!? देशद्रोही आत्ता देशभक्त झाले!!! देशद्रोही अस्लम शेख, आत्ता देशभक्त झाले!!!???’ असं सोमय्यांनी ट्वीट केलं आहे.
उद्धवा, अजब तुझे सरकार!!!?
देशद्रोही आत्ता देशभक्त झाले!!!
देशद्रोही अस्लम शेख, आत्ता देशभक्त झाले!!!??? @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSena pic.twitter.com/LiIUEDhv7a
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2019
याकूब मेमन प्रकरणी काय होती मागणी?
अस्लम शेख यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना २०१५ मध्ये पत्र लिहिलं होतं. याकूब मेमनला सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीच्या पत्रवार तत्कालीन भाजप खासदार शत्रुघ्नसिन्हा यांच्यासह काही न्यायधीश व तत्कालीन आमदार आरिफ खान, अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्यासह काँग्रेसमधील आठ नेत्यांच्या सह्या होत्या.