नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दररोज वाढत होत चालली आहे. केरळमध्ये आज रविवारी (८ मार्च) रोजी ५ जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले. पाचही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी याबाबत माहिती दिली.
शैलजा यांनी सांगितले की, केरळमध्ये कोरोनाबाधित नवे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्वजण पटनमथिट्ट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यांपैकी तीन लोक २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतले आहेत. तर इतर दोन जण त्यांचे नातेवाईक आहेत. या पाचही बाधितांना पटनमथिट्टा जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणी आणि निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. शनिवारी रात्री त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी देखील केरळमध्ये ३ बाधित आढळले होते. कोरोना विषाणूचा फैलाव जिथून सुरु झाला त्या चीनमधील वुहान जिल्ह्यामध्ये ते वैद्यकीय शिक्षण घेत होते. या तीन विद्यार्थ्यांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.
Kerala Health Minister KK Shailaja: 5 new positive cases of #Coronavirus have been admitted in the isolation wards here. Three people recently returned from Italy due to which two more got the disease here in Pathanamthitta district. (File pic) pic.twitter.com/3v0uO4UkjP
— ANI (@ANI) March 8, 2020
केरळमध्ये नव्याने आढळून आलेले पाच जण हे एकाच कुटुंबातील आहेत. यांपैकी तीन लोक काही दिवसांपूर्वी इटलीहून परतले होते. केरळचे आरोग्यमंत्री शैलजा यांनी सांगितले की, या लोकांच्या कुटुंबियांनी विमानतळावर याची माहिती दिली नव्हती त्यामुळे त्यांची तपासणी होऊ शकली नव्हती. मात्र, आता या पाच लोकांचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
भारतात आता कोरोना बाधितांची संख्या ३९वर पोहोचली आहे. यांपैकी २३ भारतीय तर १६ परदेशी नागरिक आहेत. २३ पैकी केरळमध्ये आढलेल्या तिघांवर उपचारांनंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय लडाखमध्ये २, तामिळनाडू, तेलंगणा, जयपूर आणि गाजियाबादमध्ये प्रत्येक १, दिल्लीत ३, आग्र्यामध्ये एकाच कुटुंबातील ६ आणि केरळमध्ये नव्याने आढळून आलेल्या ५ रुग्णांचा समावेश आहे.