मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मतदार सोमवारी मतदान करुन उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहे. येत्या 24 ऑक्टोबरला निकाल घोषित झाल्यानंतर बाजी कोण मारणार हे स्पष्ट होईल.
महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.
सर्व मतदान केंद्रांवर किमान अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी ‘दिव्यांग मित्र स्वयंसेवक’ असतील. दिव्यांग मतदारांना सुलभ निवडणुकीचा आनंद मिळेल यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.