मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह इतर काही विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यावरून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तिकीट कापण्याचा तो निर्णय दिल्लीतून नव्हे तर राज्यातून घेण्यात आला होता. असा खबळबळजनक दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीपासून भाजपमध्ये अंतर्गत मोठी बंडाळी झाली आहे. विद्यमान मंत्र्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजात भाजपविरोधात नाराजी आहे. त्याचा फटका भाजपलाही बसला आहे. सध्या पंकजा मुंडेसह, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत.
तिकीट नाकारण्याचा हा निर्णय दिल्लीत घेण्यात आला नसून तो महाराष्ट्रात घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी एक वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. मी भाजपा सोडणार आहे या वावड्या कुठून आल्या? असा सवालही मुंडे यांनी केला. मी नाराज नसून अशा वावड्या मी पक्ष सोडावा यासाठी जाणीवपूर्वक सोडल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.