गडचिरोली : मुलीने पळून जाऊन आंतरजातीय लग्न केल्यामुळे आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. गडचिरोलीतील आनंद नगर याठिकाणी सकाळी साडेअकराच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला.
रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावं आहेत. या तिघांनीही त्यांच्या घरामागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११.३० च्या सुमारास यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी मुलीनेआंतरजातीय विवाह केला. त्यानंतर या तिघांनीही आत्महत्या केली.
या तिघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीबाहेर मोबाईल आणि चपला काढून ठेवल्या होत्या. विहिरीच्या काठावर मोबाईल आढळल्याने या तिघांची शोधाशोध सुरु झाली. तेव्हा त्यांचे मृतदेह विहिरीत सापडले.
दीड महिन्यापूर्वी मुलीने प्रेमविवाह केला होता….
एका शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीने आपण प्रेमविवाह करणार असल्याची कल्पना दीड महिन्यापूर्वी घरी दिली होती. मात्र तिच्या घरुन या विवाहाला विरोध करण्यात आला. घरातून लग्नाला विरोध असल्याने शनिवारी ती घरातून पळून गेली. या घटनेचा जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने कुटुंबीयांनी विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने मुलीच्या आई-वडिलांनी आणि भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.