मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला कामानिमित्त मुंबई येथे मंत्रालयात कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे पैसा आणि प्रचंड वेळ यामध्ये जात होता. मुंबई त मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी २४ डिसेंबररोजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात एक मुख्यमंत्री सचिवालय कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. अखेर सर्व विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. हे कक्ष विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर कार्यान्वित झाले आहेत. मंत्रालयात ब-याच वेळी एकाच वेळी काम होत नाहीत. कधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असतात, तर कधी अधिका-यांचा, संबंधित मंत्र्यांच्या सह्या होत नाही. त्यामुळे कामं रखडली जातातं. यावेळी नागरिकांचा चांगलाच मनस्ताप होतो. अशावेळी आत्महत्येसारखे प्रकार मंत्रालयात घडत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करता सरकारने ही पाऊले उचलली होती. त्यामुळे सर्वस्तरातून याचं स्वागत होतं आहे.
प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. हे कक्ष विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर कार्यान्वित झाले आहेत.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 20, 2020
सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, सरकारस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवदने, मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्वीकारून त्यावर कार्यवाहीसाठी संबंधीत क्षेत्रीय स्तरावरील सरकारी यंत्रणेकडे पाठविण्यात येतात. यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आलं आहे.
हे अधिकारी बघणार कामकाज…
उपायुक्त (महसूल) हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार असून, एक नायब तहसीलदार, एक लिपिक/लिपिक टंकलेखक ही पदे काम पाहणार आहेत. विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाच्या क्षेत्रीय कक्षात (सीएमओ) सर्वसामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ याबाबतची पोचपावती संबंधितांना दिली जाणार आहे.
ज्या अर्जावर किंवा संदर्भावर क्षेत्रीय स्तरावरच कार्यवाही अपेक्षित आहे, असे सर्व अर्ज, विभागाच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. तसेच या कक्षामध्ये प्राप्त होणारे एकूण अर्ज, उचित कार्यवाहीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज इत्यादी सर्व बाबींचा मासिक अहवाल सरकारला देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील या विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु…
प्रशासकीय विभाग – विभागातील जिल्हे
- कोकण– मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- नाशिक– नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार
- औरंगाबाद– औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना व हिंगोली
- पुणे विभाग– कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली
- नागपूर– अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशिम
- अमरावती विभाग– भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व गोंदिया