औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भाजपला मोठी खिंडार पडणार आहे. भाजपचे माजी शहर, जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार किशनचंद तनवाणींसह पंधरा ते वीस नगरसेवक भाजपला रामराम ठोकणार आहेत. एप्रिलमध्ये औरंगाबाद महानगर पालिका निवडणुका होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकरुन निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
किशनचंद तनवाणी मुळचे शिवसैनिक असून त्यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला होता. २०१४ मध्ये भाजपकडून मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. तनवाणींकडे भाजपचे शहराध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र २०१९ मध्ये शिवसेना भाजप युती झाल्यानंतर औरंगाबाद मध्य मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे तनवाणी यांना पक्षश्रेष्ठींनी माघार घ्यायला भाग पाडले होते. तेव्हापासून तनवाणी नाराज होते. नाराजीमुळे ते भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.
शिवसेनाला फायदा होणार…
किशनचंद तनवाणी हे शिवसेनेत असतांना महापौरपद, शिवसेना शहर प्रमुख, विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांना कामाचा अनुभव आहे. पक्षसंघटनेचे चांगले अनुभव कार्यकर्त्यांची मोठी फळी ही त्यांची जमेची बाजू आहे. तसेच दांडगा जनसंपर्क असल्यामुळे शिवसेनेला पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी चांगलाच फायदा होणार आहे. तनवाणींचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.