नागपूर : शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात केली. तोगडीया विश्र्वहिंदू परिषदेतून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तोगडियांमध्ये कटूता निर्माण झाली होती. तोगडियांनी जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत अयोध्येतील राम मंदिर उभारणीची महत्वाची घोषणा केली. त्यामुळे राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करून तोगडियांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजाणी करणार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारण्यासाठीच्या ट्रस्टची लोकसभेत घोषणा केली. त्यामुळे राम मंदिराच्या आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी आणि हिंदुस्थानशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनीच राम मंदिर आंदोलनाला नेतृत्व दिलं आणि हिंदू नवचेतना जागवली. त्यामुळे त्यांच्या या योगदानाबद्दल भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी तोगडीया यांनी केली.
यांनाही भारतरत्न देण्याची मागणी…
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना भारत सरकारनं भारतरत्न द्यावा अशी मागणी प्रवीण तोगडीया यांनी केली आहे.