मुंबई : विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कवी, गीतकार, श्रेष्ठ उर्दू साहित्यिक,कार्यकर्ते कैफी आझमी यांची आज 101 वी जयंती आहे. गूगलने त्यानिमित्त खास डूडल साकारून कैफी आझमी यांची 101 वी जयंती साजरी करीत आहे. खरं तर गूगल बर्याचदा अशा लोकांची डूडलद्वारे आठवण ठेवते, ज्यांनी समाजात त्यांच योगदान दिले आहे.
हिंदी चित्रपट विश्वातील प्रख्यात कवी आणि गीतकार कैफी आझमी यांची शेरो- शायरीची प्रतिभा लहानपणा पासूनच दिसून येऊ लागली होती. बॉलिवूडची गाणी आणि पटकथांमध्ये प्रेमाच्या कविता लिहिण्यास माहीर असलेले कैफी आझमी हे 20 व्या शतकातील नामवंत कवी होते. १४जानेवारी १९१९ रोजी उत्तर प्रदेशमधील आजमगड जिल्ह्यातील मिझवान गावात जन्मलेल्या सय्यद अख़्तर हुसैन रिज़वी उर्फ कैफी आझमी यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांची पहिली कविता लिहिली. १९४२ मध्ये त्यावेळी महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनामुळे कैफी आझमी यांना प्रेरणा मिळाली आणि नंतर ते उर्दू वर्तमानपत्रात लिहिण्यासाठी मुंबईला आले. कैफी आझमी मुंबईमध्ये एका उर्दू वर्तमान पत्रासाठी लिखाण करत होते. १९४३ मध्ये त्यांचा ‘झंकार’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता.
कैफी आझमी यांचे वडील जमींदार होते. वडील हुसैन यांना कैफी आझमी यांना सर्वोच्च शिक्षण द्यायचे होते आणि त्यासाठी लखनऊ मधील सुप्रसिद्ध सुल्तान उल मदारिस येथे त्यांना दाखल केले होते. कैफी आझमी मधील कवी लहान असतानाच दिसून आला होता. वयाच्या केवळ ११ व्या वर्षापासूनच कैफी आझमीने मुशायारांमध्ये भाग घेणे सुरू केले, जिथे त्यांना बरीच नगद देखील मिळत असे.
१९४२ मध्ये कैफी आझमी यांना उर्दू आणि फारसी भाषेत उच्च शिक्षणासाठी लखनऊ आणि अलाहाबाद येथे पाठविण्यात आले होते, परंतु कैफी यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरवात केली आणि त्यानंतर भारत छोडो आंदोलनात हि सामील झाले. कैफी आझमी यांना त्यानंतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, साहित्य व शिक्षण यांचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. 10 मे 2002 रोजी कवी यांचे निधन झाले.