मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरुणीची मृत्यूशी झुंज आज सोमवार ( १० फेब्रुवारी) संपली. तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येणार असून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात कामही सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा आज मृत्यू झाला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीला वाचवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. तिला चांगल्या आरोग्य सुविधाही देण्यात आल्या होत्या. परंतु, ही तरुणी वाचू शकली नाही, याचं दु:ख आहे, असं सांगतानाच पीडित तरुणीच्या वडिलांशी बोलणं झालं. त्यांचं सांत्वनही केलं. पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.
हिंगणघाट जळीतकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. या खटल्याचं कामकाज उज्ज्वल निकम पाहणार आहेत. त्यांनी कामही सुरू केलं असून निकम हे पोलिसांच्या संपर्कात आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असाच सरकारचा प्रयत्न राहणार आहे, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. पीडित तरुणीच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पुन्हा एकदा निकम यांच्याशी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोललो. या दोघांचीही येत्या एक-दोन दिवसांत बैठक होणार असल्याचंही ते म्हणाले.