मुंबई : आंध्रप्रदेश सरकारने महिलांविरोधात वाढत्या गुन्हेगारीला,अत्याचाराला आळा घालण्यासाठी दिशा कायदा आणला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच लवकरच नवीन कायदा येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. “विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी श्रीमती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे,” असं राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे,
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 26, 2020
अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनाबाबत हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप केला होता. त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पत्रकार परिषदेमधून उत्तर दिलं होतं. देशमुख म्हणाले,” महिलावरील अत्याचार आणि हल्ल्यांच्या घटना थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
आरोपींना तातडीनं आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकारनं कायदा केला आहे. तसा कायदा राज्यात करण्याच्या अनुषंगानं आंध्र प्रदेशात गेलो होतो. माझ्यासोबत वरिष्ठ अधिकारीही होते. तो कायदा नीट समजून घेतला आहे. दिशा कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरूपात लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दिशा सारखा कायदा आणण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं काम हा कायदा करेल,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.