मुंबई : मुंबईच्या कामाठीपुरा येथील इमारतींचा क्लस्टर प्रकल्पामार्फत पुर्नविकास होणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज सोमवारी (१७ फेब्रुवारी) रोजी कामाठीपु-याची पाहणी केली व रहिवाशांशी संवाद साधला. रहिवाशांनी आतषबाजी करुन स्वागत केले. यावेळी आमदार अमिन पटेल व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील कामाठीपुरा भागाचा क्लस्टर प्रकल्पामार्फत पुर्नविकास प्रकल्पाची म्हाडा अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.@PTI_News @ANI@CMOMaharashtra https://t.co/c3zmbAaHOA
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 17, 2020
गुहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी कामाठीपु-याच्या समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करुन सर्वेक्षणाला सुरुवात करावी, असे निर्देश मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास दिले होते. कामाठीपु-यातील सुमारे ४० एकर जमिनीवर वसलेल्या एक हजार इमारतींपैकी ७०० इमारती आणि चाळी १०० वर्ष जुन्या असून त्या धोकादायक बनल्या आहेत. ५० ते १८० चौरस फुटाच्या खोलीत येथील रहिवासी धोकादायक अवस्थेत राहत असल्याने हा पुनर्विकास आव्हानात्मक ठरणार आहे. विशेष म्हणजे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सैफी-बु-हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्ट च्या धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश आव्हाड यांनी दिले आहेत.
दरम्यान आज, गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाडांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना सोबत घेऊत कामाठीपु-याच्या भागाची पाहणी केली. यावेळी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांनी डॉ. आव्हाडांची आणि आमदार पटेल यांची ओवाळणी केली. यावेळी नागरिकांनी समस्यांचा पाढा यावेळी वाचला.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कामाठीपुरा हा महत्वाचा भाग असून चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ येथे निर्माण करू. येथील रहिवाशांना चांगली घरे मिळतील त्यादृष्टीकोनातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं पाऊले उचलली आहेत. अशी माहिती माध्यमांशी बोलतांना दिली.