मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या प्रकरणी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून त्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
थोरात पुढे म्हणाले की, हिंगणघाटची घटना महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी आहे. राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपवलेले आहे. अशा घटना पुन्हा घडू नये आणि आरोपीला जरब बसावी यासाठी आणखी कठोर कायदा करण्याचेही राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
या तरुणीला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. तिला चांगल्या आरोग्य सुविधाही देण्यात आल्या होत्या. परंतु, तीला वाचवण्यात अपयश आले याचे दुःख आहे. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन या कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे, असेही थोरात म्हणाले.