मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने हिंमत असेल तर विधानसभेची पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावी. असं वारंवार भाजपकडून आव्हान केल्या जात आहे. त्याला राष्ट्रवादीकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय. आम्हाला निवडणुकांचं चॅलेंज देण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी मोदींना सांगून संसद बरखास्त करावी. असं प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.
आम्ही लढू आणि जिंकू. तुम्ही जाऊन रुग्णालयात स्वत:चा उपचार करा. तुम्हाला जनतेने दिलेला कौल समजत नाही. ही महाविकासआघाडी २५ वर्ष काम करेल, असं दावाही नवाब मलिक यांनी केला. “भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे. सत्तेत कसं येऊ याचाच विचार दिवसभर करतात. रात्री त्यांना सत्तेची स्वप्नं पडतात. हा आजार वाढत जाणार आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या डॉक्टरकडून उपचार घ्यावा”, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिला.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा, आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा दावा केला. त्याला नवाब मलिकांनी उत्तर दिलं. भाजपची काळजी वाटते. त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगू, हिंमत असेल तर त्यांनी आता लोकसभा निवडणूक घेऊन दाखवावी. दिल्लीत जशी भाजपची विधानसभेला अवस्था झाली, तशीच देशात होईल, असं नवाब मलिक म्हणाले.