पुणे : महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. राज्य सरकारनं खबरदारी म्हणून, जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
अजित पवारांनी हे मुद्दे मांडले…
लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. लग्न समारंभाला वधू व वराकडील फक्त २५ लोक असावेत.
बंदचे आदेश पुढील ३१ मार्चपर्यंत नव्हे; तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील.
व्यापाऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.
मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा सरकारचा मानस.
रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मालकांनी वेतन द्यावे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांनी गर्दी केल्यास पीएमपीच्या मिनी बसेस सोडाव्या लागतील.
पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.
केंद्राकडे निधी मागण्याची गरज नाही. राज्य सक्षम आहे.
निधीची अडचण कुणालाही जाणवू देणार नाही.
संशयितांनी पळून जाऊ नये, डॉक्टरांचे ऐकावे.
आर्थिक शिस्त लावण्यासाठी ३१ मार्चपूर्वीचे व्यवहार करावे लागतील. मात्र काही बाबतीत मुभा दिली जाईल. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
खासगी कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे. आर्थिक नुकसान महत्त्वाचे की माणूस न गमवणे महत्त्वाचे, याचाही विचार करावा.
आरोग्याच्या खर्चासाठी तरतूद करण्यासंबंधी शासन निर्णय जाहीर करणार.
ग्रामीण भागातील रुग्णालयेही तयार ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषदेला निधीची कमतरता भासणार नाही.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना करोनाचा
प्रादूर्भाव रोखण्यासाठी खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचे निर्बंध उठवण्यात आले आहेत.