दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर भारतीय संघानं न्युझीलंडच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला विजय-पराभवाचा थरारात रोहित शर्मानं अविस्मरणीय खेळीचं दर्शनं घडवलं आणि न्यूझीलंडविरूद्धची पाच सामन्याची टी-२० मालिका भारतानं ३-० नं खिशात घातली. न्यूझीलंडच्या भूमीत भारतानं पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळं भारताचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे.
भारतीय संघाने याआधी न्यूझीलंड दौऱ्यात दौनवेळा टी२० मालिका खेळली आहे. यामध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये फक्त एक सामना जिंकता आला होता. न्यूझीलंडमध्ये भारताला दोन्ही वेळेला मालिका जिंकण्यात अपयश आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००८-०९ मध्ये ०-२ अशी हार पत्करली होती तर गेल्या वर्षी भारताला १-२ असे पराभूत व्हावे लागले होते.
यंदाच्या दौऱ्यात मात्र भारताने यजमान न्यूझीलंडचा मालिकेत पराभव केला आहे. या विजयासाह भारताने नवीन इतिहास रचला आहे.
तिसऱ्या सामन्यात मुंबईकर रोहित शर्माच्या तडाखेबाज दोन सिक्सरच्या जोरावर टीम इंडियाने न्यझीलंडचा विजय हिरावून घेतला. न्यूझीलंडला अखेरच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. तिसरा सामना न्यूझीलंडने जवळपास जिंकला होता. कारण केन विल्यम्सन आणि रॉस टेलर मैदानात होते. पण शामीने धारधार गोलंदाजी करत पहिल्यांदा विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना टेलरला बाद केले. २० षटकात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. विल्यम्सनने ४८ चेंडूत ९५ धावांची दमदार खेळी केली तर मार्टिन गप्टिलने ३१ धावांची खेळी केली. विल्यम्सन-गप्टिलशिवाय एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला धावा काढता आल्या नाही. टेलर, मुनरो आणि सँटरला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि शामीनं प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. चहल आणि जाडेजाला प्रत्येकी एक एक बळी मिळाला.