शिर्डी : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर आज मंगळवारी (१८ फेब्रुवारी) दिलगिरी व्यक्त केली आहे.
समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंग्रह, अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी मागितली आहे.
इंदोरीकर महाराजांची दिलगिरी
रामकृष्ण हरी
महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग, आजतागत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल आणि इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या २६ वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!
काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज?
इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”