अहमदनगर : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात टँकर घोटाळा जलयुक्त शिवार आणि चारा छावण्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अहमदनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची आज सोमवारी (२० जानेवारी) बैठक झाली. यावेळी आमदार रोहित पवारांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यांसाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर…
या बैठकीत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. या बैठकीत प्रामुख्याने तीन मागण्या झाल्या. ज्यामध्ये जलयुक्त शिवार, टँकर घोटाळा आणि चारा छावण्या हे तीन विषय होते. या तिन्ही विषयांबाबत उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.