वसई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का,” असं म्हणत भाजप खासदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा वापरली आहे. यावरून चांगलेच राजकारण तापलं आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचाही समाचार घेतला. शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडा ही आत्महत्या करेल, असं ते म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथे रविवार (२ फेब्रुवारी) एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं.
दिलगिरी व्यक्त करायला कमीपणा वाटत नाही : आशिष शेलार
“कोणाचाही अपमान करणे आमची संस्कृती नाही. मी कुणाचाही नावं घेतलं नाही. कोणाला वाईट वाटत असेल तर आम्हाला दिलगिरी व्यक्त करण्यास कमीपणा वाटत नाही. संविधानाबद्दल आम्हाला शिकवू नका. असंविधानिक भाषा वापरल्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करायला काही वाटत नाही. मात्र संविधानिकरित्या बनवलेल्या कायद्याला विरोध करणे, संविधानिक आहे का?” असं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं.