मुंबई : भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.
भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असा थेट इशारा दिला आहे. आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू न करायला हे बापाचं राज्य आहे का, असं विधान केलं होतं. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
जयंत पाटील म्हणाले, “भाजपनं इतकं घसरण्याची गरज नाही. मला वाटतं त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. म्हणूनच भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली. इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपनं आत्मचिंतन करावं.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आशिष शेलार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, “आशिष शेलार जे बोलले ते मला खूप आवडलं. मी त्यांना आजच सांगतो की होय हे उद्धव ठाकरेंच्या बापाचंच राज्य आहे. हे जितेंद्र आव्हाडच्या बापाचंच राज्य आहे. काळ्या मातीला सह्याद्रीच्या पर्वताला मानणारे आम्ही काळ्या मातील आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो. हे मराठी मनाचं राज्य आहे, असं देशभरात-जगभरात सांगणाऱ्यांची आम्ही औलाद आहोत. आम्ही आमचा बाप गुजरातमध्ये शोधायला जात नाही.”