नवी मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येऊन सत्तास्थापन केली. त्यानंतर सर्व सत्तासमीकरणंही बदलत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला असून भाजपचा सफाया झाला आहे. भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमधून यंदा सुमारे ९३ टक्के मतदान झालं होतं. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी व चार व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झालं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांमध्ये होती. त्यात महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे.
राज्यात सत्ता असताना गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व छोटी-मोठी सत्तास्थानं ताब्यात घेण्याचा सपाटा भाजपनं लावला होता. सत्ता गेल्यानंतर हे चक्र उलटं फिरू लागलं आहे. काही जिल्हा परिषदांनंतर आता अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपची पुरती पिछेहाट झाली आहे. बाजार समितीच्या सर्व विभागांवर महाविकास आघाडीनं वर्चस्व राखलं आहे.