मुंबई : सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. अशी खंत व्यक्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार व्यक्त केली.
शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. आर्थिक मंदी, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होत आहे. आर्थिक मंदीचे परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात दिसू लागले आहेत. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वाधिक कारखाने बंद पडले आहेत,’ असं माजी पंतप्रधानांनी म्हटलं. सर्वसामान्यांसाठी योजना आखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 लाख खातेदारांना दिलासा द्यावा…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएमसी बँक प्रकरणात लक्ष घालून 16 लाख खातेदारांना दिलासा द्यावा, असं आवाहन सिंग यांनी केलं. ‘पीएमसी बँकेच्या खातेदारांसोबत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून 16 लाख खातेदारांना सहन कराव्या लागत असलेल्या अडचणी दूर कराव्यात,’ असं सिंग म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या प्रकरणात लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्यावा, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.
सरकारच्या आर्थिक धोरणांचा उद्योगांना फटका…
सरकारच्या आर्थिक धोरणांचा मोठा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना बसला आहे. सतत चार वर्षांपासून राज्यातील उत्पादन घटत आहे. भाजपाकडून प्रशासनाच्या डबल इंजिन मॉडेलची जाहिरातबाजी सुरू आहे. मात्र हे मॉडेल पूर्णपणे फसलं आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या उत्पादनात सतत होणारी घट हेच अधोरेखित करते, अशा शब्दांत माजी पंतप्रधानांनी सरकारच्या विकासाच्या दाव्यांचा चिरफाड केली.