मुंबई : मनसेचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) ला समर्थन नसून विरोधच आहे. मनसेने पाठिंबा जाहीर केला नसून, माध्यमांनी विपर्यास केला. मनसेचा ९ फेब्रुवारीचा मोर्चा हा पाकिस्तान, बांग्लादेशी घूसखोरांच्या विरोधात आहे. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.
गोरेगाव येथील मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ जानेवारीला पक्षाची विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली होती. पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मनसे ९ फेब्रुवारीला मोर्चा काढेल असं जाहीर केलं होतं. यावेळी राज ठाकरे म्हणाले होते. मी पहिल्या सभेतच सांगितलय की, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत. आम्ही अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांना नाकारु शकत नाही असे राज म्हणाले होते.
जावेद अख्तरांबरोबर ऊर्दू भाषेवरुन झालेल्या चर्चेचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. ऊर्दू मुस्लिमांची भाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? ऊर्दू मुस्लिमांची भाषा नाही. बांगलादेश बंगाली भाषेसाठी स्वतंत्र झाल. ऊर्दूसाठी नाही. भाषा कुठल्याही एका धर्माची नसते तर ती त्या भागाची असते असे राज म्हणाले.
जे इथे येऊन धिंगाणा घालणार तर मी आडवाच जाणार. रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी आमच्या पोलिसांवर हात टाकला होता त्यावेळी मोर्चा काढला होता. हिंदी सिनेसृष्टीत पाकिस्तानी कलाकार धिंगाणा घालत होते. त्यावेळी त्यांना हाकलण्याचं काम मनसेनं केलं. त्यावेळी कोणी मला हिंदुत्वाच्या मार्गाने चाललोय हे विचारलं नाही असा सवाल राज यांनी केला होता.