यवतमाळ : शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरूण रोजगारसाठी भटकत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांना काहीच फरक पडत नाही. कारण, मोदींना अंबानी, अदाणी यांनी कामाला लावले आहे. मोदी अंबानी व अदाणीचे लाऊडस्पीकर असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लावला. मोदी मुळ मुद्यांवरून जनतेचे लक्ष कायम भरकटवत ठेवतात आणि तुमचे लक्ष विचलीत होताच भारताचा संपूर्ण पैसा या उद्योजकांच्या खिशात भरतात. हेच सध्याचे वास्तव आहे. असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आज मंगळवार यवतमाळ येथील वणी येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरादार टीका केली. मोदींचे सरकार जोपर्यंत राहील, तोपर्यंत भारतातील युवकांना रोजगार मिळणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, प्रत्येक बँक खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातील, त्या अगोदरच्या निवडणुकीत सांगितले होते की, प्रत्येक बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील. तुम्हाला हे पैसे मिळाले का? नाही ना. कारण, ज्या ठिकाणी ते जातात काहीना काही खोटं बोलतात. योग्य मुद्यांवरून तुमचे लक्ष दूर केले जाते. कधी चंद्राबद्दल बोलतील, कधी कलम ३७० बद्दल बोलले जाईल, कधी जिम कार्बेट पार्कमध्ये चित्रीकरण करतील. मात्र, जे तुमच्या समोर मुद्दे आहेत, ज्या तुमच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांसमोर जे प्रश्न आहेत, तरुणांसमोर जे बेरोजगारीचे आव्हान आहे, त्याबद्दल मोदी कधीच एक शब्दही बोलणार नाहीत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले का? जर कर्ज माफ झाले नसेल, तर मग एवढा पैसा जातो कुठं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच, काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी कार्पोरेट टॅक्स माफ केला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या १५ जणांचा १ लाख २५ हजार कोटी रुपयांचा टॅक्स एक दिवसात माफ करण्यात आला. मागील पाच वर्षात पाच लाख ५० हजार कोटी रुपये भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजकांचे कर्ज माफ केले गेले. उद्योजकांची कर्ज माफ होतात मग शेतकऱ्यांची कर्ज का माफ होत नाहीत? असे त्यांनी विचारले. तसेच, हिंदुस्थान पेट्रोलियम व एअर इंडियाचे खासगीकरण केले जात आहे. हळूहळू संपूर्ण देश या १५ -२० उद्योजकांच्या स्वाधीन केला जात असल्याचेही राहुल म्हणाले.
राहुल म्हणाले की, अर्थमंत्री ‘जीएसटी’ बद्दल बोलताना सांगतात ‘जीएसटी’ तर कायदा आहे. तो आम्ही कसा बदलू शकतो. गरिबांसाठी असलेले कायदे लगेच बदलता येतात. मात्र, लहान दुकानदार व व्यावसायिकांसह सामान्य व्यापाऱ्यांच्या खिशातून पैसे चोरणारा ‘जीएसटी’ कायदा ते बदलू शकत नाहीत. देशभरात तुम्हाला एकही गरीब व्यक्ती सापडणार नाही की जो म्हणेल मला ‘नोटाबंदी’ व ‘जीएसटी’मुळे फायदा झाला आहे. मात्र, अंबानी, अदाणी सारखे उद्योजक नक्कीच म्हणतील की, यामुळे आम्हाला लॉटरी लागली आहे. कराण, लहान उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे आता केवळ त्यांचच राज्य आहे. पंतप्रधान मोदींचे सरकार जोपर्यंत राहील, तोपर्यंत भारतातील युवकांना रोजगार मिळणार नाही. मीडिया देखील उद्योजकांच्या ताब्यात असल्याचा यावेळी राहुल गांधी यांनी आरोप केला.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुरेश धानोरकर, श्याम उमाळकर आदींसह काँग्रेसचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.