नागपूर : नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. सध्या तेथे हिवाळी अधिवेशन सुरु आहेत. मात्र, नागपूर शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने महापौर संदीप जोशी या हल्ल्यातून बालंबाल बचावले. विशेष म्हणजे दोन धमक्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला.
महापौर संदीप जोशी यांना १२ दिवसांपासून धमक्या येत होत्या त्यानंतर जोशी यांच्यावर हा हल्ला झाला. महापौर संदीप जोशी कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. यानंतर ते परतताना त्यांचा वाहनाचा पाठलाग करत दुचाकीस्वा हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर तीन गोळ्या चालवल्या. नागपूर शहारातील वर्धा रोड एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ हा हल्ला करण्यात आला.
मला दोन धमक्या मिळाल्या – संदीप जोशी
जोशी यांच्या वाहनाच्या मागील बाजने हल्लेखोर दुचाकीवर आले होते. मी स्वतः वाहन चालवत होतो. माझ्या सीटच्या बाजूच्या काचेवरती एक गोळी, दुसरी गोळी मधल्या सीटवर आणि मागील बाजूस तिसरी गोळी मारण्यात आल्या. यानंतर माझे वाहन रस्त्याचे कडेला गेले, यामुळे आम्ही सर्वजण वाचलो. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही.
मला ६ डिसेंबर रोजी पहिली तर १२ डिसेंबर रोजी दुसरी धमकी मिळाली होती. त्यामुळे हल्लेखोर मागावर असावेत, असा संशय आहे. नागपूर पोलीस हल्लेखोरांना शोधुन काढतील असा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महापौर सुरक्षित राहणार नसतील तर, कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चालेल? – देवेंद्र फडणवीस
जर महापौर सुरक्षित राहणार नसतील तर, कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चालेल? असा प्रश्न उपस्थित करत, या घटनेची गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नागपूर शहाराचे महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार झाला, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर महापौर सुरक्षित राहणार नसतील, तर कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चालेल? मला वाटतं की याची अत्यंत गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही सरकारकडे देखील मागणी करणार आहोत की, या घटनेची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारचे जे आरोपी आहेत, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. अशी प्रतिक्रीया फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.