मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर दुसरे आसाराम बापू असल्याचा आरोप केला आहे. नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी दबाव टाकल्याचाही आरोपी तनुश्री दत्ताने केला. तिने आज (७ जानेवारी) आपल्या वकिलांसह लैंगिक शोषणाप्रकरणी दाखल प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली.
तनुश्री दत्ता म्हणाली, नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावे नष्ट केले. पावसकर यांनी २००५ पासून नाना पाटेकर यांच्यावरील अनेक लैंगिक शोषणाची प्रकरणे निलेश पावसकर यांनी रद्द केल्या आहेत. नाना पाटेकर आणि मनसेचे काय संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलवून सेटवर गोंधळ घातला. त्यानंतर गणेश आचार्यने माझं करिअर उद्ध्वस्त केलं.
बॉलिवूड माझं पॅशन होतं. यांनी ते हिरावून घेतलं. यांनी माझं करिअर खराब केलंय. त्यांनी माझं २४ व्या वर्षी लैंगिक शोषण केलं. त्यामुळे मी यापैकी एकालाही सोडणार नाही. हे सगळ्यांना पैसे खाऊ घालतात. मी शेवटपर्यंत लढेल. हे सगळे आता म्हातारे झालेत. मी अजून तरुण आहे. या सगळ्यांना रडवल्याशिवाय राहणार नाही. आता पुन्हा हे प्रकरण सुरु होतंय. यांनी त्यांचा गुन्हा मान्य करावा. त्यांना जास्त त्रास होणार नाही, असंही तनुश्रीने नमूद केलं.
तनुश्री दत्ताने नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केला. नाना पाटेकर यांनी नाम या संस्थेच्या नावाने परदेशातून कोट्यावधींच्या देणग्या घेतल्या. हा पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटायचा आणि फोटो काढायचा की यांचा काम झालं. असाही आरोप केला.
१७ जानेवारीला पहिली सुनावणी…
तनुश्रीने पोलिसांवरही या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला. १७ जानेवारी रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी होईल. आता आम्ही विजयाच्या अगदी जवळ आहोत, असंही तनुश्री म्हणाली.