मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. हे सरकार कंगाल झालं आहे. या सरकारची अवस्था कंगाल आणि दारुड्यासारखी आहे. अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आज गुरुवार (९ जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. सरकार चालवण्यासाठी १३ लाख कोटींची गरज असते. या सरकारकडे तेवढी रक्कम नाही. नवीन बजेट येईपर्यंत रक्कम जमणे अशक्य आहे. केंद्र सरकारला यंदा १२ लाख कोटींची तूट येणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले. त्यामुळे देश चालवणे कठीण होणार आहे. म्हणूनच दारुडा जसा घरातील वस्तू विकतो. त्याप्रमाणे हे केंद्रातील सरकार मालमत्ता विकत असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला.
देशातील खरा आतंकवादी संघ…
जेएनयू प्रकरण भाजपकडून घडवलं जात आहे. त्यात त्यांची वृत्ती आहे. हे लोक शहरी आतंकवादी म्हणतात. पण देशातील खरा आतंकवादी संघच आहे, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. अमेरिका-इराण युद्ध झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं म्हटलं आहे.