मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याने देश पेटला आहे. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या कायद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘हा कायदा माझ्या जातीविरोधात आहे. मी ज्या वंजारा समाजातून येतो, त्यातील अनेकजण मजुराची कामं करतात. अनेक महिलांना शेतातच मुलं होतात. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नसतात. त्यांनी काय करायचं?’ असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावर जोरदार टीका करत केंद्र सरकारला लक्ष केले.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. विद्यार्थ्यानंतर आता राजकीय पक्षांनीही आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेससहीत 15 राजकीय पक्षांनी काल या कायद्याविरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. सरकारनं दोन पाऊलं मागे येत हा कायदा परत घ्यावा अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली. बॉलिवूड कलाकारांनीही यामध्ये उडी घेतली आहे. विशेष म्हणजे रेणूका शहाणे यांनी तर मोदींना चांगलेच सुनावले. ह्या कायद्याविरोधात सर्व स्तरातून आता विरोध वाढत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.