नवी दिल्ली : निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. याबाबत पटियाला कोर्टाने आज मंगळवारी डेथ वॉरंट जारी केले आहे. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र आरोपींना शिक्षा होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे प्रचंड टीका होत होती.
पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा या चार आरोपींचे नाव आहेत. आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या आधी या प्रकरणातल्या विनय, पवन आणि मुकेश या आरोपींनी अशाच प्रकारची याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्या सर्व याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. केवळ फाशीच्या शिक्षेच्या अंलबजावणीला विलंब व्हावा यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं बोललं जातंय. हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर देशभर प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्यानंतर एन्काउंटर प्रकरण झालं. त्यामुळे वेगळं वादळ निर्माण झालंय. बलात्कारासारख्या अत्यंत घृणास्पद प्रकरणातल्या आरोपींच्या शिक्षेवर वर्षानुवर्ष अंमलबजावणी होत नसल्यामुळेही राग व्यक्त करण्यात येत होता.
सात वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयासोबत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाची सुटका झालेली आहे. त्याचवेळी तिहारमध्येच एका आरोपी रामसिंगने आत्महत्या केली. उर्वरित चार दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येईल.