मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने शासकीय कार्यालयांना सात दिवसांसाठी सुट्टी देण्याची चर्चा सुरु होती. परंतु शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली नाही असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात ४० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनानं सुरूवातीच्या टप्प्यात शाळा, महाविद्यालयांना सुटी, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह गर्दी होणाऱ्या संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले. मुंबईत गर्दीला आवर घालण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला. सध्या महाराष्ट्रात करोना दुसऱ्या टप्प्यात असून, लॉक डाऊनच्या दिशेनं सरकारनं पाऊलं टाकली आहेत. भारतीय रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत.
सर्व देवस्थान बंद…
महाराष्ट्रातील विविध देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. महाराष्ट्रात फोफावत चाललेल्या करोना संसर्गाचा धोका लक्षात घेत जवळपास सर्वच देवस्थानांनी देवदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानापासून ते शेगाव येथील गजानन महाराज देवस्थानांना समावेश आहे.
गर्दी रोखण्यासाठी रेल्वेचा घेतला हा निर्णय…
मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. करोना व्हायरसची दहशत राज्यभरात आहे. मुंबईत लोकल स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.