पुणे: राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज बुधवार (१२ फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर शाळा व महाविद्यालयांतही हा निर्णय लागू करण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांच्या संघटनेने केली आहे.
पाच दिवसांचा आठवडा हा राज्य शासनाचा निर्णय राज्य कर्माचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. तो निर्णय शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना लागू करण्यात आलेला नाही. हा शिक्षकवर्गावर अन्याय असून विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ५ दिवसांचा आठवडा करणे गरजेचे आहे, असे नमूद करत शाळा-महाविद्यालयांतही दररोज कामाचा अर्धा तास वाढवून ५ दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले.