नागपूर हिवाळी अधिवेशनात आज शेतक-यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी तो प्रयत्न हाणून पाडला. राज्याने केंद्राकडे मागणी केली आहे. अद्याप एक पैसाही केंद्राकडून आलेला नाही. त्यामुळं त्यांनी विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडं जाऊन गळा मोकळा करावा. वाटल्यास गळा मोकळा करण्याची गोळी आम्ही त्यांना देऊ,’ असं उद्धव यांनी सुनावलं.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मुद्दा आज विरोधी बाकांवरील भाजपनं लावून धरला होता. शिवसेनेनं यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी भाजपच्या काही सदस्यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या प्रती सभागृहात आणल्या होत्या. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर पलटवार केला. ‘
केंद्र सरकारकडं साडेपंधरा हजार कोटींची मागणी केली…
शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणारच आहे. आम्ही तुम्हाला करायला लावलं असा आव कुणी आणू नये,’ असं ते म्हणाले. ‘राज्यानं केंद्र सरकारकडं साडेपंधरा हजार कोटींची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २२०७ रुपयांची मागणी केली आहे. तर, पूरग्रस्तांसाठी ७ हजार कोटींची मागणी केली आहे. मात्र, अद्याप एक पैसाही केंद्राकडून आलेला नाही. खरंतर जे विरोधक इथं बोंबलताहेत, त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रात आहे. त्यामुळं त्यांनी विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडं जाऊन गळा मोकळा करावा. वाटल्यास गळा मोकळा करण्याची गोळी आम्ही त्यांना देऊ,’ असं उद्धव यांनी सुनावलं. यामुळे पुन्हा सत्ताधारी विरुध्द विरोधक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.