मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत केलेलं काम उल्लेखनीय होतं. आजही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील, आपल्या विचारांशी तडजोड करतील असं वाटत नाही, असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.
मनसे आणि भाजपची जवळीकता वाढली आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या वेळी राज ठाकरेंनी मोदी सरकारविरोधात घणाघात करत अप्रत्यक्षरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली होती. या मदतीची जाणीव काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ठेवलेली दिसत आहे.
मनसे आणि भाजपच्या नेत्यांकडून येणा-या विधानांवरून ही दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. मात्र, मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपची जोरदार पोलखोल केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभांमधून भाजपवर हल्लाबोल केला होता त्यामुळे ते भाजप सोबत जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.