महायुतीच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सर्वच नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी अजूनही महाराष्ट्रात एकही सभा घेतलेली नाही. महाराष्ट्रातील प्रचाराकडे त्यांनी पाठ फिरवली. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर 19 ऑक्टोबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. शनिवारी 19 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. तरीही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी अजूनही महाराष्ट्रात एकही सभा घेतलेली नाही.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे राज्यात प्रचार सभा आणि रोड शोची मागणीही केली. मात्र, अद्याप ही मागणी अमान्य आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराची सर्व जबाबदारी महाराष्ट्रातील नेते पार पाडत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. त्यामुळेच भाजपचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत जातीने लक्ष देत आहेत.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या, गृहमंत्री अमित शाह यांनीही अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र, काँग्रेसचे बडे नेते या निवडणुकीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेत आपली पकड मजबूत करण्याची काँग्रेसकडे संधी होती. मात्र, दोन राज्यांमध्ये इतक्या महत्त्वाच्या लढती असूनही काँग्रेसचे दिग्गज अजूनही प्रचाराच्या मैदानात उतरलेले नाहीत.
महायुतीतील सेना-भाजपा हे विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी अनेक सभा घेत फिरत आहेत. महायुतीची आज एकत्रित सभाही आहे. मात्र, आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख पक्षाची अद्यापही विधानसभा निवडणुकीसाठी एकही संयुक्त प्रचारसभा झालेली नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचीही एकत्रित सभा नाही. त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज महाराष्ट्रातील निवडणुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. याचा मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.