मुंबई : ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे. सैफ म्हणाला, “चित्रपट चालावा यासाठी या चित्रपटात राजकीय कथा बदलून दाखवण्यात आली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.” तो फिल्म कॅम्पेनिअनच्या पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होता. एकीकडे आम्ही उदारमतवाद आणि विवेकाबद्दल बोलतो आणि दुसरीकडे लोकप्रियतेचा मार्ग निवडतो, असंही सैफ म्हणाला.
सैफ अली खान म्हणाला, “काही कारणांमुळे मी या कथेबाबत ठोस भूमिका घेऊ शकलो नाही. कदाचित पुढच्यावेळी मी नक्कीच भूमिका घेईन. मी चित्रपटातील भूमिकेबाबत खूप उत्साही होतो. या व्यक्तिरेखेने मला प्रभावित केले होते. मात्र, चित्रपटात जी कथा दाखवली आहे तो इतिहास नाही. इतिहास काय आहे हे मला खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे.”
‘चित्रपटात ऐतिहासिक तथ्य नाही…
भारताची संकल्पनाच इंग्रजांनंतर तयार झाली, त्याआधी ही संकल्पनाच नव्हती असं माझं मत आहे. या चित्रपटात कोणतेही ऐतिहासिक तथ्य नाही. आम्ही याबाबत कोणताही तर्क देऊ शकत नाही. कलाकार उदारमतवादी विचारांचं समर्थन करतात मात्र कामात लोकप्रियतेलाच प्राधान्य दिले जाते, हे सत्य आहे. मात्र, ही चांगली स्थिती नक्कीच नाही, असंही सैफने नमूद केलं.
‘चित्रपटातील इतिहासाशी एक भारतीय म्हणून सहमत नाही…
अभिनय आणि स्क्रिप्टमधील चुका सहन होतील मात्र, व्यावसायिक फायदा व्हावा म्हणून त्याच्या राजकीय कथेत बदल केलेले अजिबात चालणार नाही, असं मत चित्रपट निर्माते कबीर खान यांनी व्यक्त केलं होतं. याचा आधार घेत पत्रकार चोप्रा यांनी सैफला प्रश्न विचारला. त्यावर सैफ म्हणाला, “हे खरं आहे की या चित्रपटात दाखवलेल्या राजकारणाचा तथ्यांशी काहीही संबंध नाही. याच्याशी मी केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक भारतीय म्हणूनही सहमत नाही. मी अशा प्रकारच्या राजकारणावर याआधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. मी पुढच्यावेळी अशा कथांबाबत अधिक सतर्क राहिल.”
मला माहिती आहे हा इतिहास नाही. पण मग मी ही भूमिका का केली असाही प्रश्न विचारला जाईल. मात्र, मी या भूमिकेने खूप प्रभावित झालो होतो. असे चित्रपट चालतात असं लोकांना वाटतं, मात्र हे धोकादायक आहे.