दिल्ली : शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १ डिसेंबरपूर्वी मजबूत सरकार स्थापन होईल. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली. सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत दिली.
राऊत यांनी सांगितले की, बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे. बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये काय चर्चा झाली याबाबत मी वक्तव्य करणं योग्य नाही. परंतु या बैठकीत सरकार स्थापनेसंदर्भात काही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. किमान समान कार्यक्रमावर कालची बैठक आधारीत होती. ही बैठक सकारात्मक झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये यावर अंतिम निर्णय होईल,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच “राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यापुढील सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणार आहेत,” असंही ते म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होईल. आम्हाला पाच वर्ष सरकार चालवायची आहे. काँग्रेसचे नेतेही बैठकांसदर्भातील माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना देत आहे. सध्या तरी त्यांची भेट घेण्याचं कोणतही नियोजन नसल्याचंही, राऊत यांनी स्पष्ट केलं.