राज्यात तरूण मतदारांचा आकडा हा उल्लेखनीय असा आहे. तरूण मतदारांमध्ये 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे. तरूण मतदार कुणाला साथ देतो यावर बरेच काही अवलंबून आहे.
राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 8 कोटी 99 लाख 36 हजार 261 मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण 5 हजार 560 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष 4 हजार 54 आहेत तर 1 हजार 506 अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.
सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये 5325 मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण 96 हजार 654 मतदान केंद्रे असतील. दिव्यांग,ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे,यासाठी पहिल्या व दुसर्या मजल्यावरील पाच हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हिएम)चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट,1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राज्यात 50.67 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामध्ये फ्लॅश मॉब, पथनाट्ये, विशेष कार्यक्रमाचे आयोजन आणि व्हीव्हीपॅट – ईव्हीएम मशीनचा डेमो यासारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.