मुंबई :आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणीच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या. यामुळे आरे कॉलनीत मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यावरणप्रेमी झोरू भथेना व ‘वनशक्ती’ या सेवी संस्थेने कारशेडबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.यासाठी हजारो झाडांच्या कत्तली होणार हे निश्चित झालं आहे.
मुंबई वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीसाठी दिलेली परवानगी वैध आहे का? आरे कॉलनी हे वनक्षेत्र आहे का? तसेच मेट्रो कारशेडची उभारणी मिठी नदीच्या पूरक्षेत्रात होत आहे की नाही? अशाप्रकारच्या चार याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या 2 महिन्यांपासून याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती. याप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र त्यावेळी कोर्टाना निकाल राखून ठेवत 4 ऑक्टोबरला सुनावणी केली जाईल असे स्पष्ट केले होते.
याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने चारही याचिका फेटाळून लावल्या आहेत. नगरसेवक यशवंत जाधव यांनाही याप्रकरणी दंड ठोठावला आहे. मुंबई हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी याप्रकरणी निकाल दिला आहे.
काही दिवसांपासून आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडीसाठी अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर कोर्टाने सुनावणीदरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो कारशेडसाठी आरेतील एकही झाड कापू नये असे आदेश दिले होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीतील वृक्षतोडीला भाजपासोडून काँग्रेस,मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने विरोध केला होता. सर्व पर्यावरण प्रेमी याबाबत एकवटले होते.