मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत आज (१५ जानेवारी) महत्वपूर्ण निर्णय घेतला. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची अडीचशे फूट होती ती आता ३०० फूट करण्यात येणार आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, स्मारकासाठी कोणत्याही अडचणी येणार नाही. पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची आता शंभर फूटांनी वाढवण्यात येणार आहे. आधी पुतळ्याची उंची अडीचशे फूट होती ती आता ३०० फूट करण्यात येणार आहे. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार असून आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता तो आता ९९० कोटींवर जाणार आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय –
१. दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावास मान्यता. pic.twitter.com/mIaiIau7PW— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 15, 2020
अजित पवारांनी २ जानेवारीरोजी घेतला आढावा…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ जानेवारी रोजी आंबेडकर स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर स्मारकातील सर्व अडथळे दूर करुन १४ एप्रिल २०२२ पर्यंत म्हणजेच दोन वर्षात स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा नवीन प्रस्तावही तयार करण्यात आला. तो बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मान्यताही देण्यात आली.
१२५ एकरच्या जागेवर उभारणार स्मारक…
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने सन २०११ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिलच्या १२५ एकरच्या जागेवर उभारण्यात येणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये सत्ताबदल झाले. राज्यात भाजपाचे सरकार अस्तित्वात आले. स्मारकासाठीच्या कामाच्या मंजुऱ्या आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भुमिपूजन करण्यात आले होते.