मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके (PMC) च्या खातेदार आणि ठेवीदारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत (मेडिकल इमर्जन्सी) खातेदारांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांशी संपर्क साधता येईल. ही अट घातली त्यामुळे ग्राहाकांमधून रोष व्यक्त करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. हवालदिल झालेले खातेदार मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. या खातेदारांना आता मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खातेदारांना एक लाख रुपये काढता येतील. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या प्रशासकांशी संपर्क साधावा लागणार आहे. आरबीआयनं ही माहिती उच्च न्यायालयात दिली आहे.
बँक खात्यातून पैसे काढण्यावरील बंदीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी आरबीआयनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात खातेदारांना विवाह, शिक्षण यांच्यासह अन्य आपत्कालीन स्थितीत ५० हजारांपर्यंतची रक्कम काढता येते, असं नमूद केलं आहे.