मुंबई : मुंबईतील ‘माहीमचा दर्गा’ प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविक येतात. मात्र, शाह मखदूम फकिह अली माहिमी दर्गा आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. दर्ग्यात दर्शनी भागावर भारतीय राज्यघटनेची प्रस्थावना लावण्यात आली. भारतात एखाद्या प्रार्थनास्थळावर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लावणारे माहीमचा दर्गा देशातील पहिलेच धार्मिक स्थळ ठरले आहे.
संत शाह मखदूम फकिह अली माहिमी यांची ६०७ वी पुण्यतिथी (उर्स) या आठवड्यात साजरी करण्यात येत आहे. माहिमच्या दर्ग्यावर काही धर्मपंडित, धर्मनिरपेक्षतावादी, वकील, डॉक्टर्स आणि शिक्षकासह शेकडो लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या वेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या फलकाचे उद्घाटन झाल्यानंतर माहीमच्या दर्ग्यांवर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. आपल्या उजव्या हातने सलामी देत या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
ही प्रस्तावना सुवर्णाक्षरांनी लिहून, कायमस्वरुपी फ्रेम करणार…
माहीमच्या दर्ग्याशी संलग्न असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांकडून नियमीतपणे या फलकावरील भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करून घेतले जाते. आता ही प्रस्तावना सुवर्णाक्षरांनी लिहून ती कायमस्वरुपी फ्रेम करण्यात येणार आहे, अशी माहिती दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहैल खंडवानी यांनी सांगितले. ही प्रस्तावना भारताच्या नकाशाच्या आता लिहिली जाईल, आणि नकाशाच्या पार्श्वभूमीला राष्ट्रध्वजाच्या तिरंगी रंगाची प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. पुढच्याच आठवड्यात हे काम केले जाईल, असेही खंडवानी यांनी सांगितले.
माहीमच्या दर्ग्यावर राष्ट्रध्वजही फडकावण्यात आला होता…
काही दिवसांपूर्वी आपल्या पारंपरिक झेंड्याबरोबरच माहीमच्या दर्ग्यावर राष्ट्रध्वजही फडकावण्यात आला होता. या वेळी देखील दर्ग्याचा झेंड्याबरोबरच सर्व भाविकांनी येथे राष्ट्रध्वजही फडकावला. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करत राष्ट्रध्वजाला सलामीही देण्यात आली. समाजातील लोकांना जोडणे आणि त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण करून समाजात सामाजिक सौहार्द आणि शांतीचा संदेश देण्यासाठी दर्ग्याने हे पाऊल उचलल्याचे खंडवानी म्हणाले. या वेळी उपस्थितांनी देशात शांतता आणि सौहार्द नांदण्यासाठी प्रार्थना केली.