पुणे : दोन लाखाची कर्जमाफी स्वागतार्ह आहे मात्र ही शुद्ध फसवणुक आहे. यु टर्नला आता उद्धवजी टर्न म्हटलं पाहीजे. उद्धवजी टर्न म्हणजेच उद्धव नावात येणारा यु आणि दिलेल्या प्रत्येक शब्दातुन ते माघार घेतात. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना हाणला.
पुणे येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या विविध कामांवर टीका केली. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला. दोन लाखाची कर्जमाफी स्वागतार्ह आहे मात्र ही शुद्ध फसवणुक आहे. प्रत्यक्ष सत्तेमध्ये नसताना मागण्या करणं सोप असतं आणि सत्तेत आल्यानंतर कळतं हे प्रॅक्टीकल नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला होता त्यानुसार शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी यु टर्न मारला असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सरकारने दोन लाखाची कर्जमाफी केली. २००१ ते २०१६ या कालावधीतील दोन लाखापर्यंतचं कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफीला राहिला नाही. आता फक्त दोन लाखावरचे शेतकरी राहिले आहेत आणि यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणुक असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.