मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात आज मंगळवारी राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच राज्यात महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा. असे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिले.
बैठकीत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत तब्बल एक तास बैठक चालली. यावेळी राज्यातल्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. जेणेकरुन महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ आणि जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल, असे काम करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. यावेळी निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा, असेही आदेश देण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करा. काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावेत. आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.
पोलीसांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करा…
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्यकालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील, असेही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.