नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टिकास्त्रं सोडलं. सावरकर म्हणजे काय? हे दुसऱ्यांना समजून सांगण्याआधी स्वतः समजून घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता? अशा शब्दात गोवंश हत्याबंदीच्या कायद्यावरुन भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू यांचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना मुख्यमंत्री विधीमंडळात बोलत होते. उध्दव ठाकरे म्हणाले, ‘किरेन रीजिजू आणि मनोहर पर्रिकर बोलले आहेत. मनोहर पर्रिकरजी दुर्दैवाने आपल्यात नाहीत, गोव्याचे माजी मुख्यमंत्री, कोणत्या पक्षाचे होते मनोहर पर्रिकर? गोमांस कमी पडू देणार नाही, कमी पडलं तर मी बाहेरुन आणेन, असं ते मुख्यमंत्री असताना बोलले होते. रीजिजू स्वतः बोलले मी गोमांस खाणार, काय करायचं ते करा. कोणाला सावरकर शिकवताय? तुम्हाला तरी कळलेत का सावरकर? आम्हाला तरी कळले आहेत का? ज्या कळलेल्या नाहीत, त्यावरुन एकमेकांवर बोलत राहायचं.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावलं.
‘गैरसमज करुन घ्यायचा नसेल, तर आणखी एक सांगायचं आहे. आपल्याला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य आहे? सावरकरांचं गायीबद्दलचं मत आपल्याला मान्य आहे. एक निशाण, एक विधान, एक देश, एक कायदा, जरुर पाहिजे, पण जेव्हा गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात, का नाही लागू झाला संपूर्ण देशभर आणि सगळ्या राज्यांमध्ये? माझ्या महाराष्ट्रामध्ये ती माता आणि बाजूला खाता?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.