नवी मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर माजी मंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. चार महिन्यांनंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक आहे. राज्यातून भाजपची सत्ता गेली. त्यामुळे गणेश नाईक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री गणेश नाईक यांनी समर्थक नगरसेवकांना स्नेहभोजनाचं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी नाईक पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. अशी चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार येईल, या आशेने विधानसभा निवडणुकांच्या महिनाभर आधी गणेश नाईक यांनी पुत्र संदीप नाईक यांच्यासह भाजपचा प्रवेश केला होता. त्यावेळी मी नवी मुंबईच्या विकासासाठी भाजपात प्रवेश करत आहेत असे सांगितले, होते. तसेच पंधरा वर्ष मी काही करु शकलो नाही ती खंत मनात आहेत असेही गणेश म्हणाले होते. शिवसेना-भाजप महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याचीही त्यांना अपेक्षा होती. मात्र फासे पालटले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे गणेश नाईकसह सर्व नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे.
चार महिन्यांनंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील विळा-भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. नाईकांच्या दृष्टीने पालिका निवडणूक महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत आलेले त्यांचे पुत्र आणि तत्कालीन आमदार संदीप नाईक यांना भाजपने ऐरोली मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. परंतु ऐनवेळी तिकीट बदलून गणेश नाईकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीच्या गणेश शिंदेंना पराभूत करुन गणेश नाईक निवडून आले. मात्र भाजपला आता विरोधी पक्षात बसावं लागलं आहे.
नाईकांना ही आहे भीती…..
राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबईतही यशस्वी झाला, तर महापालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता धूसर होईल. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष होऊन पालिका निवडणूक लढवण्याची मागणी नाईक सर्मथकांनी उचलून धरली आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी निर्णय बदलला तर भाजपाल मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
गणेश नाईक यांचं नवी मुंबई पालिकेवर 17 डिसेंबर 1992 पासून वर्चस्व….
17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली आहे. गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे.