मुंबई : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे महिलेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार तसेच औरंगाबाद व मुंबईत घडलेल्या महिला अत्याचारानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा ऍड. चारुलता टोकस यांनी म्हटले आहे.
महिलांना त्वरीत न्याय मिळावा यासाठी चारुलता टोकस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, महिलांवर होणारे ऍसिड हल्ले, बलात्कार, पेटवून देणे अशा प्रकारच्या गुन्ह्याकरिता अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करुन कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी. महिलांवरील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करुन दोषींना शिक्षा होण्याकरीता एक महिन्याच्या कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी व तसा कायदा करावा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी एक महिला अधिकारी नियुक्त करावी. सर्व शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवण्या तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.