Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखअंधश्रध्देचे भूत!

अंधश्रध्देचे भूत!

पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रध्देचे भूत तथाकथित बुवा,बाबांनी एवढे मानगुटीवर बसवले की अंधश्रध्देच्या आडमध्ये नागरिकांना भीती दाखवुन बुवा,बाबा गब्बर बनले. कोणतंही काम न करता अंधश्रध्देच्या आडमध्ये विज्ञानाला फाटा देत आहेत. या सर्व प्रकारात रग्गड कमाई करुन घेत आहेत. फक्त अशा तथाकथित मंडळींना निमित्त लागतो. चंद्रग्रहण होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु या वेळी तथाकथित बुवा,बाबांनी याच्या आडमध्ये महिलांमध्ये भिती निर्माण केली. ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.ग्रहण काळात झोपू नये घराची साफ सफाई करू नये. गर्भवती स्त्रियांनी  देवाची उपासना करावी. जप करावा. घरातून बाहेर जाऊ नये. व ग्रहण काळी काहीही खाऊ नये. नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो. ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे. ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो. ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका अशा एक ना अनेक प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरवुन दहशत निर्माण केली. समाजाची अंधश्रध्देपासून कटकट दूर होऊन मुक्तता मिळावी. यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच् अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यानी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा अमलात यावा यासाठी सुमारे सोळा वर्षे संघर्ष केला होता. त्यांच्या मागणीनुसार सरकारने विधेयक तयार केले होते व विधेयक विधिमंडळात मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. पण तेथे ते चौदा वर्षे अडकले होते. जेव्हा दाभोलकर यांची अत्यंत अमानुषपणे हत्या झाली होती. त्याच्या दुसर्‍या दिवशी सरकारने तो कायदा वटहुकूम काढून अमलात आणला होता. मूळ विधेयकाचे नामकरण अंधश्रध्दाऐवजी ‘जादूटोणा विरोधी विधेयक’ असे करण्यात आले होते. १३ डिसेंबर २०१३ ला विधानसभेत तर १८ डिसेंबर २०१३ ला विधान परिषदेत हा अध्यादेश पास करुन तो कायदा अस्तित्वात आला. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरले. कायदा मंजूर करून क्रांतिकारी टप्पा गाठला. परंतु अंधश्रध्देची दुकान चालवणाऱ्या तथाकथित आणि ढोंगी बाबा,बुवांना या कायद्याची शिक्षा होत नाही. कारण राजकीय पक्षांना त्यांचीही राजकिय दुकान चालवावी लागते. त्यामुळे कायदे करुनही राजकीय इर्षे पोटी कारवाई होत नाही. हीच खरी शोकांतीका आहे. अकराव्या- बाराव्या शतकात श्रीचक्रधर – ज्ञानदेवांपासून आपल्याकडे सुधारणेचे वारे वाहत आहेत. नामदेव, तुकाराम, एकनाथांच्या संत साहित्यापासून तर अगदी अलिकडच्या गाडगेबाबांच्या किर्तनांपर्यंत अशा अघोरी प्रथांवर संतांनी कोरडे ओढले आहेत. जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमानुसार भूत उतरविण्याच्या बहाण्यानं चमत्काराचा प्रयोग गुप्तधन, करणी,भानामती या नावानं अमानुष, अनीष्ट, अघोरी कृत्य करणे, नरबळी देणे, एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, अपशकुनी आहे, सैतान आहे असं जाहीर करणं, भूत पिशाच्चाना आवाहन करून घबराट निर्माण करणे, कुत्रा, साप, विंचू  चावला तर एखाद्या  व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्र तंत्र, गंडे दोरे, किंवा त्यासारखे उपचार करणे.बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणं, गर्भवती महिलेच्या गर्भातील बालकाचे लिंग बदलण्याचा  दावा करणे. स्वतःमध्ये अलौकिक शक्ती आहे अथवा आपण कोणाचे तरी अवतार आहोत असा दावा करणे. एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा धंद्यासाठी आणि व्यवसायासाठी वापर करणे. अशा अघोरी प्रकारांवर त्यात बंदी आहे. हे अघोरी प्रकार कायद्याने लगेच दूर होतील, असे नाही. त्यावर मूलगामी उपाय शिक्षण हाच आहे. या अनिष्टांवर कार्यक्षम उपाय समाजप्रबोधन हाच आहे. हे प्रबोधन ज्याप्रमाणे विद्यालयातील औपचारिक शिक्षणातून होऊ शकते, त्याचप्रमाणे, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात, भाषणे, कीर्तने, प्रवचने, नाटकादि मनोरंजनाची साधने यातूनही होऊ शकते. तेव्हा या कायद्याबाबत गैरसमज होऊ नये. त्याचा जास्तीत जास्त प्रसार करून तो सामान्य जनतेला सहज समजावा यांसाठी प्रत्येक सुजाण नागरिकांनी तो जनतेपर्यंत नेला पाहिजे. त्याची प्रभावी अंमलबजावणी हिच काळाची गरज आहे. अन्यथा अंधध्देच्या नांदी लागून होत्याचे नव्हते होईल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments